गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११

गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११ प्रसिद्ध झाला.जागतिक कीर्तिच्या प्रख्यात लेखिका शोभा डे,रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजविणार्‍या वर्षा उसगावकर यांच्यासह अनेक नामवंतांचा सहभाग असलेला हा अंक आहे. येथे *गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११ * वाचा
*श्री नाथबाबा शांती मंदिर संस्थान,हातरुण ता.बाळापूर जि.अकोला_ सार्वजनिक न्यास नोंदणी क्र.ए-१६७३(अकोला)*
Related Posts with Thumbnails

जगी व्हावे मोल : डॉ.श्रीकृष्ण राऊत


मिथ्या न लिहवी कवित्व हे फोल ।
जगी व्हावे मोल ऐसे करी ॥

- भ्रमरनाथ
‘हातरूणचे नंदादीप’ पृ़ ९१

ह्या चरित्रग्रंथाचे नायक ब्रह्मलीन परमपूज्य श्री नाथ महाराज़ पूर्ण नाव श्री महादेवनाथ यादवनाथ पारसकऱ भ्रमरनाथ हे त्यांनीच धारण केलेले एक नाव़ भ्रमरनाथ ह्या नावाच्या शिक्क्याने त्यांनी काही अभंग लिहिले़ वर उद्धृत केलेला अभंग हा त्यातीलच एक़
साधनेच्या चढत्या पायर्‍यांवर येणारे अनुभव, साधकाच्या विविध अवस्था, याचा सहज उल्लेख नाथ महाराजांच्या बोलण्यात यायचा़ वाचा स्फुरण म्हणजे काव्य स्फुरणे हा त्यापैकीच एक अनुभव़ एक अवस्था़ अशाच अवस्थेत नाथ महाराजांना काव्यस्फूर्ती झाली़
सर्व साधक साधनेच्या एका भारावलेल्या टप्प्यावर कवी असतात़ परंतु सगळे कवी हे साधक असतातच असे नाही़ ह्यातील भेद स्पष्ट करणारे सूत्रच नाथ महाराजांनी वरील अभंगात सांगितले़ मिथ्या आणि फोल कवित्व करणारे हे केवळ कवी आणि जगी मोल व्हावे ऐसे कवित्व करणारे संतकवी, कालानुक्रमे ज्ञानेश्वर, एकनाथ, कबीर, तुकाराम हे साधकावस्थेतून सिद्ध झालेले संत कवी़ अभिजात साक्षीभाव ज्याला साधला त्यालाच ते जमावे़ हे कोण्या ‘येरा गबाळ्याचे काम नोहे़.’
लौकिकार्थाने ‘याती-कूळ हीन’ असणे, चारदोन पुस्तके शिकणे, तथाकथित विद्यापीठीय पदव्या धारण करणे ह्या गोष्टी देखील या बाबतीत तेवढ्याच मिथ्या आणि फोल आहेत़.
प्रतिभा हा परमेश्वराचा प्रसाद आहे़ ‘अमंगळ भेदाभेद’त्या परमात्म्याच्या गावी नाहीत़ ‘रखमादेवीवर’ असलेल्या त्या बापाला सर्व लेकरे सारखी, त्याने हरेकाला हा प्रसाद वाटला़ जसा आपला पिंड तसे आपले पात्र तितकीच आपली पात्रता़ जेवढा आपला तळहात तेवढा आपला वाटा़ अधिक उणेपणाचे मोजमाप लावणे म्हणजे प्रसादाची चव नासवणे़ परमेश्वराने आपल्याला प्रसादासाठी पात्र समजले़ पसायदानाने आपल्याला अनुग्रहीत केले म्हणून आपण परमेश्वराचे कोटी कोटी आभार मानले पाहिजेत़ त्याच्या पायी लीन झाले पाहिजे हा संतकवीचा स्थायी भाव़ आपल्या कवित्वाचा ‘बोलविता धनी’ आपल्याहून ‘वेगळा’ आहे ही निरहंकारी जाणीवच संत कवींना नेणीवेच्या पल्याडची राणीव बहाल करते़ म्हणून तर आपले लोकमानस ज्ञानेश्वरांना ‘ज्ञानियांचा राजा’ आणि तुकारामांना ‘तुको बादशाह’ मानून आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान करते़ कळीकाळाला जिंकणार्‍या या संतकवींनी ‘लोखंडाचे चणे’ केवळ खाल्लेच नाहीत तर चांगले पचवलेही आहेत़
याच परंपरेने संस्कारीत केलेले संतकवी आहेत महादेवदास़ या चरित्रग्रंथाचे लेखक़ कागदोपत्री असलेले त्यांचे नाव श्री महादेव जाणूजी सोनोने़ आज वय वर्षे अठ्याहत्तऱ या चरित्रग्रंथाचे नायक असलेल्या श्री महादेवनाथांचे हे शिष्य़ म्हणून त्यांनी महादेवदास असे नाव धारण केले़ ज्यांना भक्तमंडळी परमआदराने सोनोनेबाबा म्हणतात़
नाथ महाराजांचा जन्म इ़ स़ १९१८ सालचा़ सोनोनेबाबा त्यांच्याहून अकरा वर्षाने लहाऩ सोनोनेबाबांचा जन्म इ़ स़ १९२९ मधला़ इ़ स़ १९४० साली नाथ महाराज २२ वर्षाचे होते़ त्यांची योगसाधना, अध्यात्म साधना चालली होती़ सोनोनेबाबा तेव्हा ११ वर्षाचे होते़ तेव्हापासून दोघांचे जे मैत्र जुळले ते इ़ स़ २००० साली नाथ महाराजांचे निर्वाण होईपर्यंत कायम दृढ होत गेले़ या ६० वर्षांच्या, पाच तपांच्या कालखंडात सोनोनेबाबा नाथ महाराजांसोबत सावलीसारखे राहिले़ सोनोनेबाबांची तयारी पाहून नाथ महाराजांनी योग्यवेळी त्यांना अनुग्रहीत केले़ शब्दांत मांडता येणार नाही असे आत्मभान या हृदयीचे त्या हृदयी घातले़ सोनोनेबाबांचा प्रवास मैत्र-सख्य-दास-आत्मनिवेदन अशा भक्तिभावाच्या चढत्या श्रेणीत झाला़ म्हणून ते या चरित्रग्रंथाला आत्मनिवेदन म्हणतात़
लौकिक अर्थाने सोनोने बाबांचे कूळ अजापाळांचे़ अजापाळ म्हणजे शेळी पालन करणारे धनगऱ शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत़ नाथ महाराजांनी सोनोनेबाबांकडून वेद, उपनिषदे, पुराण, कुराण, बायबल, रामायण, गीता, पवनविजय, ज्ञानेश्र्वरी, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, तुकाराम गाथा, दासबोध, हरिविजय, पांडवप्रताप, शिवलीलामृत, नवनाथग्रंथसार, गजानन विजय, साई सत्‌चरित, ग्रामगीता अशा ग्रंथांची शेकडो पारायणे करून घेतली़ लोकगीतातून उत्क्रांत झालेल्या ओवी-अभंग अशा लोकछंदांचा अभ्यास करून घेतला़ संतांच्या
अक्षरवाङ्मयाच्या ह्या लोकविद्यापीठात सोनोनेबाबा खर्‍या अर्थाने परीक्षित झाले़
सोनोनेबाबांच्या मनोभूमीत बीजरूपाने अंकुरत असलेले हे कवित्व ‘परतत्त्वस्पर्शाची’ वाट पाहत होते़ इ़ स़ २००० मध्ये नाथ महाराजांनी देह ठेवीपर्यंत, जवळपास ६० वर्षे सोनोने बाबांचा प्रत्यक्ष संवाद नाथ महाराजांशी व्हायचा़ गेल्या सात वर्षात अंतःकरणातल्या नाथ महाराजांशी सोनोनेबाबा बोलत राहिले़ अनाहतपणे मनात झिरपणार्‍या त्या चैतन्याचा शोध घेत राहिले़ वाचा पुन्हा स्फुरू लागली़ नादब्रह्म पुन्हा एकदा पिंगा घालू लागले़ शब्दरूपाने प्रकटू लागले़ गेले वर्षभर सोनोनेबाबा संज्ञेच्या पातळीवर एक एक प्रसंग नाथ महाराजांसोबत पुन्हा एकदा जगले़ त्यातून साकारला हा ४,३२५ ओव्यांचा श्री महादेवनाथ चरित्रग्रंथ़
“सहज समाधी भली’ या सूत्राला प्रमाण मानणार्‍या सोनोनेबाबांच्या चालण्या-बोलण्यात एक कमालीचा सहज भाव आहे़ वरकरणी वेषाने ‘बावळा’ वाटणारा हा माणूस अंतरी कोणकोणत्या ‘नाना कळा’ घेऊन वावरतो याचा अंदाज भल्या-भल्या साधू-महाराजांना येत नाही़ वरपांगी अडाणी दिसणार्‍या या माणसाला हा ग्रंथ लिहिणे शक्यच नाही़ कोणीतरी यांना लिहून दिला असेल़ अशी प्रतिक्रिया जनमानसात स्वाभाविकपणे उमटू शकते़ काही वर्षे मागे १९७३ साली सोनोने बाबांचा ‘श्री यादवनाथ योगलीलामृत’ हा ग्रंथ प्रकाशित झाला़ तेव्हा याला काय येते; नाथ महाराजांनीच ग्रंथ लिहून याचे नाव केले असेल असे खुद्द त्यांच्या सासरेबुवांनीच सुनावले होते़ आपल्याला जे आयुष्यात जमले नाही ते इतर कोणाला कसे काय जमेल असे तर्कट या मागे असते़
‘श्री यादवनाथ योगलीलामृत’ या ग्रंथाचे सुरुवातीचे दोन अध्याय नाथ महाराजांनी लिहिले़ ही गोष्ट खरी होती़ तसा स्पष्ट उल्लेखही त्या ग्रंथात आहे़ पहिल्या दोन अध्यायातल्या ओव्या आणि नंतरच्या ओव्या यातील भेद स्पष्टपणे लक्षात येतो़ सोनोनेबाबांच्या ओव्यांचे कूळ एकनाथी आहे़ एकनाथ महाराजांच्या साडेतीन चरणाच्या आटोपशीर ओवीत तीन चरणांच्या अंती तीन यमक तर येतातच पण त्या सोबतच अर्ध्या चरणाच्या मध्ये चौथे यमकही येते़ यमकाच्या या चौथ्या स्थानाने आशयाच्या बांधणीची नीरगाठ अडसल्या जाते़ ओवीच्या आकृतीबंधाचे अंगभूत सौंदर्य आधक रेखीव होते़ अशी एकतरी ओवी अनुभवण्यासाठी ह्या चरित्रग्रंथातला हा बघा एक मासला -
मन शरीराचा साथी । मन शरीराचा घाती । मन नेई देवत्वा प्रती । मन अधोगती नेत असे ॥ (अ़ ५ ओ़ ८७)
सोनोनेबाबांच्या ओवींचे नाते एकनाथांशी असले तरी त्यांच्या भाषेचे गोत्र मात्र तुकारामांचे आहे़ साधी, सरळ, सोपी, थेटपणे बोलणारी त्यांची भाषा ही लोकभाषा आहे़ ‘सिधासामा’, ‘नेटी’, ‘गमेना’, ‘झुंजूमुंजू’,‘अलाबला’, ‘चोखट’ ‘गडी’, ‘गाईगवार’, ‘बंदा’, ‘धक’, ‘धस’, ‘पास’,‘खटला’, ‘नवाई’ सारख्या शब्दांचे शेकडो अणुरेणू या ग्रंथात भेटतात़ ज्यांच्या लालित्यकडा जल्लद आहेत़ त्यांच्या भाषेचा हा पोत अस्सल मराठमोळा आहे़ त्यांच्या ओवीत प्रासादिक सहजता आहे़ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने साधलेला सहजयोग त्यांच्या ओवीतही तितकाच बावनकशी उतरला़ खरे तर व्यक्ती आणि आभव्यक्ती हे एक विलक्षण अद्वैत असते़ जशी व्यक्ती तशीच तिची आभव्यक्ती़ अहंकाराने ताठरलेल्या व्यक्तीच्या अभिव्यक्तीतले काठिण्य लपता लपत नाही़ अशा कलेचं कलेवर होतं ती फोल ठरते आणि म्हणूनच मिथ्याही़.
१ मे १९७२ ला ‘श्री यादवनाथ योगलीलामृत’ या ग्रंथाचे लेखन सोनोनेबाबांनी पूर्ण केले़ त्यातील तिसर्‍या अध्यायापासून पंधराव्या अध्यायापर्यंत एकूण एक हजार तीनशे ऐंशी ओव्या सोनोनेबाबांनी लिहिल्या़ तेव्हा त्यांचे वय त्रेचाळीस वर्षाचे होते़ श्री यादवनाथ योगलीलामृत ग्रंथ आपण वाचला तर आजपासून पस्तीस वर्षापूर्वीच सोनोनेबाबांमधला संतकवी परिपक्वपणे प्रकट झालेला दिसतो़ शांतिलीन श्री यादवनाथ महाराज हे नाथ महाराजांचे वडील आणि पहिले अध्यात्मगुरू़ ‘श्री यादवनाथ योगलीलामृत’ या ग्रंथात सोनोनेबाबांनी यादवनाथांच्या लीळा ओवीबद्ध केल्या़ आणि आता‘श्री महादेवनाथ चरित्र’या ग्रंथात नाथ महाराजांचे शब्दचित्र उभे केले़
सोनोनेबाबांमधला संतकवी समजून घेताना त्यांनी लिहिलेल्या वरील दोन्ही ग्रंथाचा एकत्रितपणे विचार केला पाहिजे़ नौली, नेती, धौती, बस्ती, त्राटक, कपालभाती या यौगिक क्रियांचे तपशिलवार वर्णन द्यश्री यादवनाथ योगलीलामृतद्ग या ग्रंथात आहे़ ते जसेच्या तसे द्यश्री महादेवनाथ चरित्रद्ग या ग्रंथात स्वाभाविकपणे उपस्थित होते़ नाथ महाराजांनी सोनोनेबाबांकडून योगाचा अभ्यास करून घेतला़ तो अभ्यास सोनोनेबाबांनी दोन्ही ग्रंथात मांडला़ योगमार्गाने जाऊ इच्छिणार्‍या ‘सकल जनांना शहाणे करून सोडण्याच्या, कळवळ्या पोटी ही द्विरुक्ती झाली आहे़ सोनोनेबाबांची काव्यशैली एवढी सहजसुंदर आहे की, तिला माझ्यासारख्याच्या काय पण कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही़ माझा तेवढा आधकारही नाही़ जेष्ठ गुरुबंधू म्हणून उलट त्यांचाच माझ्यावर हक्क आहे़ त्यांची आज्ञा ही गुरूंची आज्ञा मानून माझ्या अल्पमतीने मी लिहायला निमित्त झालो़
उपमांच्या उतरंडी रचणे किंवा दृष्टांताच्या धबधब्यात वाचकांना गुदमरवून टाकणे हा सोनोनेबाबांच्या प्रतिभेचा धर्म नाही़. प्रतिमा ही आजकालच्या समीक्षेत येणारी संकल्पना योजावयाची झाल्यास हा ग्रंथ अ-प्रतिमच म्हटला पाहिजे़ नाही म्हणायला त्यांच्या कथात्म निवेदनात मधूनच अवतरणारी एखादी प्रतिमा आपले मन मोहून घेते़ एखाद्या जातिवंत सौंदर्यवतीने आपली सुरेखता अधोरेखित करण्यासाठी एखाद-दुसरा नेमका अलंकार परिधान करावा अशी ही काव्यशैली आहे़ उगीच नटणे-मुरडणे तिला मानवणारे नाही़ कवीचे अस्तित्व स्वतंत्रपणे गोचर होणार नाही अशी निर्विकल्प तटस्थता समस्त ग्रंथाला व्यापून दशांगुळे उरलेली आहे़ ही सोनोनेबाबांच्या कवित्वाची ‘फळा आलेली इमारत़, ‘श्री यादवनाथ योगलीलामृत’ या ग्रंथाने तिचा द्यपाया रचिलाद्ग आणि ‘श्री महादेवनाथ चरित्र’ या ग्रंथाने त्यावर ‘कळस’ चढविला़
आजपर्यंतच्या ग्रंथांनी, शास्त्रांनी स्त्रियांना शूद्रांच्या पंगतीत बसविले़ तिला नर्काचे द्वार म्हटले़ ‘ताडन की आधकारी’ ठरविले़ समाजाचे अर्धांग असे अपंग केले़ म्हणून ऐश्वर्यसंपन्न वेदांना ज्ञानेश्वरीत ‘कृपण’ म्हटले आहे़ श्री यादवनाथ आणि श्री महादेवनाथ हे पितापुत्र ज्ञानेश्वरांच्या नाथ परंपरेमधले आहेत़ या दोन्ही नाथांचे स्त्रियांबद्दलचे विचार काळाच्या किती पुढे होते़ हे खालील ओव्या वाचल्या की आपल्याला कळते़-

‘परमार्थात कनक कांता । म्हणे ही अडसर मान्य संता ।
वायाच वाटे मज ही अहंता । तुकाराम, एकनाथा पाहुनी ॥
आमचे बाबा यादव । भोगले विलास वैभव ।
पत्नी, पुत्र, कन्या सर्व । तरी देव गडी केला ॥
स्त्री पुरुषाचे अर्धांग । स्त्री साह्यकरी येता प्रसंग ।
त्याज्य नव्हे स्त्रीचा संग । आसक्ती ठेविल्या मग अधोगती ॥
स्त्री विवेकाची शुद्ध खाणी । पहा मदालसा, मैनावती राणी ।
संत मीरेची अभंगवाणी । मनुष्या आणी देवत्व’
(‘श्री यादवनाथ योगलीलामृत’ अध्याय १४, ओवी २७-३०)

स्त्रीभ्रूण हत्या आणि मुलींचा घटता जन्मदर ही आज आपल्यापुढे फार मोठी समस्या आहे़ याबद्दल श्री महादेवनाथ महाराजांनी कितीतरी वर्षे अगोदर आतशय स्पष्टपणे आपली कान उघाडणी केली आहे़-

‘मुलगी जन्मा येता घरी । बाबांना प्रसन्नता भारी ।
भावी पिढीची माय खरी । वर्णिती थोरी आनंदाने ॥
जरी नसती अमुची माय । आभाळातून पडतो काय ।
दुसरा काही नाही उपाय । विनामाय जन्मण्याचा ॥
वेलीस दोडके-वाळके । तशी न झोंबती बालके ।
विज्ञानाच्याही कवतिके । अद्याप ना चुके मायकूस ॥
कन्या सृजनाची शक्ती । हीन न लेखावे तिजप्रती ।
शिवाची अव्यक्त पार्वती । प्रत्यक्ष मूर्ती ममतेची ॥’
(‘श्री महादेवनाथ चरित्र’ अध्याय २८, ओवी ९३-९६)

काळाची पावले ओळखणारे हे दोन्ही संतमहात्मे खर्‍या अर्थाने आधुनिक संत आहेत़ नमस्कार करण्यासाठी आलेल्या भोळ्या भाबड्या जनतेला त्यांनी दिलेले हे विचारधन म्हणजे समुचित दर्शनशास्त्रच होय़ हे दोन्ही संत महात्मे म्हणजे वर्तमान युगातले चालते-बोलते निके संस्कारकेंद्र होते़ माणूस घडविणार्‍या अशा पाठशाळा एकविसाव्या शतकातही आमच्या अवतीभवती असतात़ परंतु आधिभौतिक सुखलोलुपतेने केलेल्या गफलतीत आम्ही किती संस्कारक्षम उरलो हा प्रश्न कधी तरी आम्ही आम्हालाच विचारला पाहिजे़.
स्वातंत्र्यपूर्व काळातल्या ग्रामीण संस्कृतीच्या कितीतरी नोंदी ‘श्री महादेवनाथ चरित्र’ या ग्रंथात सापडतात़ या अंगाने हा ग्रंथ एक महत्वाचा समाजशास्त्रीय दस्तावेज आहे़ पायाला फणकट लागल्यावर बीचव्याचा पाला ठेचून त्याचे पडोळ बांधणारे लोकवैद्यक (अ़ ४ ओ़ ५९) जसे या ग्रंथात भेटते़ तसेच नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी स्त्रियांच्या पायातल्या ‘पोल्हर’ या आभूषणाचा नादही आपल्या कानात घुमत राहतो़ (अ़ ११ ओ़ ८३) दसर्‍याच्या अगोदरच्या दिवशी रेड्याचा बळी देऊन त्याच्या मांसाचे तुकडे तोरणासारखे दारावर बांधल्याने रोगराई, इडापीडा टळते़ अशी प्रथा खेड्यापाड्यातून होती़ अहिंसा परमोधर्म मानणार्‍या महानुभाव पंथाच्या लोकांना हे पाहवत नव्हते़ ते त्या दिवशी नाथ महाराजांना घेऊन विजनवासात जात असत़ ( अ़ १६ ओ़९४-१००) हा उल्लेख वाचून आजही आपल्या अंगावर काटा येतो़.
बाळाला पाळण्यात घालताना पाळण्याला आरसे लावणारे ग्रामीण वैभव आपल्याला या ग्रंथात दिसते़ (अ़ २ ओ़ ११९) प्रत्येकाच्या पगडीची बांधणी वेगवेगळी असल्याने पाटील, ब्राह्मण, देशमुख जातीची माणसं त्यांच्यापगडीवरूनच ओळखणारा वस्त्र-प्रावरणाचा इतिहासही या ग्रंथातून उलगडतो़ (अ़ ५ ओ़ १३१) न्हाव्याने भळाभळा तेल ओतून प्रज्वलीत केलेल्या मशालींच्या उजेडात बसलेल्या लग्नाच्या पंगती आपल्यापुढे तो काळ जीवंतपणे उभा करतात़ (अ़ ५, ओ़ १२७) पाचव्या अध्यायात येणारे ते विवाह वर्णन तर मुळातूनच वाचण्यासारखे आहे़ सातपुडा पहाडात असणार्‍या नरनाळ्याच्या किल्ल्यापासून तर शिवलिंग नाभी असलेल्या लासुरा स्थळापर्यंतची वर्णने वाचली की ही स्थळे प्रत्यक्ष पाहण्याची उर्मी आपल्या मनात जागी होते़ हे भूतत्त्व आपल्याला आपल्या पार्थीवतेची आत्मखूण पटवते़
ग्रंथलेखनाची सुरुवात झाल्यापासून तर ग्रंथ पूर्णत्वास जाईपर्यंतच्या सोनोनेबाबांच्या विविध मनोवस्था चढत्या श्रेणीने प्रतिमांकित झालेल्या आहेत़ ह्या ओव्यातली सहजता आपल्या मनाला भावल्याबिगर राहत नाही़-

‘हा दास महादेव । लिहितो नाथांचे अनुभव ।
धाडस केले आभनव । केली उठाठेव शब्दांची ॥ (अ़ ४ ओ़ १०१)

असो आता किती लिहू । नाथांच्या लीला बहू ।
लेखणीच लागे धावू । हाथ मागे राहू लागे ॥ (अ़ ५ ओ़ १४०)

कर्मयोगाचे तत्त्वज्ञान । नाथ दावी स्वये आचरून ।
महादेवदासाचे आत्मनिवदेन । लेखणीतून पाझरे ॥’ (अ़ १७, ओ़ १५५)
नाथांचे अनुभव लिहिण्याचे आपले हे धाडस ‘अभिनव’ असून त्यासाठी आपण ‘शब्दांची उठाठेव’ केली असे त्यांना प्रारंभी वाटते़ पुढे लगेच नाथांच्या लीला बहू आहेत़ त्यापैकी किती लिहू आणि किती नाही असे त्यांना होते़ लीळा सूचण्याचा वेग इतका आहे की, त्यांना शब्दांत पकडण्यासाठी ‘लेखणी धावू’ लागली़ या भावावेगात लेखणी धरणारा ‘हाथ मात्र मागेच राहिला’ हा भावावेग नंतर संयत होत जातो़ महादेवदासांचे आत्मनिवेदन लेखणीतून ‘पाझरू’ लागते़ ग्रंथ पूर्णत्वास जाता जाता सोनोने बाबांचे हृदय त्या‘विश्र्वात्मक’ निर्मिकाशी एवढे एकरूप होते की -

‘हृदयाच्या जुळती तारा । शब्द नेई वाहून वारा ।
घडे तसा प्रकार सारा । भेटे प्यारा जिवलग ॥’ (अ़ २८, ओ़ ८५)
लोकभाषेत एक वाक्‌प्रचार आहे़ ‘वारा अंगण झाडतो’ एखाद्यावर परमेश्वर किती मेहेरबान आहे, हे सांगण्यासाठी ‘त्याची काय गोठ सांगावं बाप्पा ! त्याचं आंगण तं वारा झाडते बावा !’ असे म्हटल्या जाते़
प्रतिभेच्या प्रसादाने अशीच संपन्नता सोनोनेबाबांना लाभली आहे़ परतत्त्वाशी ज्यांच्या हृदयाच्या तारा जुळतात़ त्यांचे शब्द ‘वार्‍याने’ सहजपणे ‘वाहून’ आणले तर नवल कसले? वार्‍याने अंगण झाडण्याचाच हा प्रकार म्हटला पाहिजे़ ही घटना साधीसुधी नाही़ त्यांचा ‘प्यारा’ जिवलग त्यांना भेटला आहे़ ज्यांना असा प्यारा’ जिवलग भेटतो त्यांचे कवित्त्व या नश्वर जगात मोल पावते़ आपल्यातील न्यूनासह कळीकाळाला जिंकते़ एरव्ही सगळेच मिथ्या आणि सर्वच फोल !

- डॉ.श्रीकृष्ण राऊत,
शंकरनगर,जठारपेठ,
अकोला.

0 comments:

आभार

प्रस्तुत ब्लॉगकरिता सौ.सरिता ढवळे,नाशिक ह्यांनीwww.nathbaba.org हे डोमेन रजिस्टर्ड करून दिले.त्या डोमेनवरही हा ब्लॉग उपलब्ध आहे.त्यांचे आभार,
LinkWithin Related Posts with Thumbnails

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP